शेतकरी नेते शरद जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय.... ....
शरद जोशी :
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे झुंजार नेते म्हणून ओळखले जाणारे शरद जोशी यांचा जन्म तीन सप्टेंबर १९३५ सातारा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावला झाले, तर मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमधून त्यांनी एम. कॉम केले. बँकिंग या विषयासाठी त्यांना सी. रँडी सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. त्यांचे कार्य शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न याभोवती फिरत राहिले.
१९७७ पासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. १९७९ मध्ये त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रमासाठी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यासाठी उपोषण, तुरुंगवास, मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, अधिवेशने असे मार्ग त्यांनी निरंतर सुरू ठेवले.
शरद जोशींचे सर्वात मोठे यश म्हणजे ‘शेतकरी तितका एक एक’ हा नारा देऊन त्यांनी शेतकरी समाजाला जात, धर्म, प्रांत, भाषा हे भेद विसरायला शिकवलं होतं. शेतकरी आंदोलन महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या अ-राजकीय संघटनांच्या समन्वय समितीची स्थापना ३१ ऑक्टोबर १९८२ रोजी केली आणि महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यांत शेतकरी आंदोलने उभारली.
चांदवड (जि. नाशिक) येथे नोव्हेंबर १९८६ रोजी अभूतपूर्व शेतकरी महिला अधिवेशन भरवले ज्यामध्ये सुमारे दोन लाख महिला उपस्थित होत्या.
शरद जोशी यांनी स्वतंत्रतावादाचा पुरस्कार करण्यासाठी १९९४ साली ‘स्वतंत्र भारत पक्षा’ची स्थापना केली. देशाची राजकीय, आर्थिक व सामाजिक यंत्रणा पूर्णपणे बदलून टाकण्याची आवश्यकता सांगताना त्यासाठी उपाययोजना सुचविणारा अनोखा, मतदारांना कोणतीही लालूच न दाखविणारा किंबहुना मतदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा निवडणूक जाहीरनामा त्यांनी मांडला.
शेतकरी संघटनेचे पहिले मुखपत्र साप्ताहिक ‘वारकरी’चे ते संपादक व प्रमुख लेखक होते. तिसऱ्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले. १९८० साली नाशकात कांदा आणि ऊस दराप्रश्नी शेतकरी संघटनेला घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि शरद जोशी हे नाव घराघरात पोहोचले. शरद जोशी हे २००४ ते २०१० या काळात राज्यसभेचे सदस्य होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकरी चळवळीत त्यांचे योगदान अन्यन्नसाधारण आहे. ‘अंगारवाटा ... शोध शरद जोशींचा’ हे त्यांचे चरित्र भानू काळे यांनी लिहिले आहे.
शरद जोशी यांचे १२ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
(माहिती संकलन : संजीव वेलणकर)